शनिवार, १२ मे, २०१८

रक्ताळलेली रात्र...

मनावरील ओरखडा...

       रात्री बारा एकाची ची वेळ होती.मला पुण्याला अर्जंट जायचे होते म्हणून मी सोलापूर हायवे वरील शेठफळ चौकात  गाडीची वाट बघत उभा होतो.पंढरपूर तालुक्यातील रोपळे बु. हे माझे गाव.मी आईला भेटायला गावी गेलो होतो.आई मला म्हणत होती "आरं रात लय झालीय, सकाळच्याला जा.गाडी न्हाय मिळायची." पण मी आईचे एक न ऐकता निघालो होतो.रात्र बरीच झाली होती.सर्वत्र निरव शांतता होती.मधूनच दूरवर ट्रकच्या हॉर्नचा आवाज ती शांतता भंग करत होता आणि मनुष्याच्या अस्तीत्वाची जाणीव करून देत होता.पूर्वी या चौकात एकही लाईटचा खांब नव्हता. जशी वेळ ढळत होती तसं माझ्या मनात किर्रर्रर्र रात कीडे ओरडल्यासारखा आवाज उगाचच गोंगाट करत होता.तरीही त्या भयाण रात्री मी गाडीची वाट बघत उभा होतो.
     सोलापूरकडून येणारी एक ट्रॅव्हल्स अचानक माझ्या पुढ्यात येऊन थांबली.मला काही कळायच्या आत माझ्या मागून एक जण आला आणि गाडीत शिरला.माझ्या काळजात धस्स झालं.तो माझ्या पाठीमागे त्या पत्र्याच्या हॉटेल मध्ये मुरकूटं होऊन झोपलेला व्यक्ती होता.बहुधा तो ट्रॅव्हल्स वाला त्या व्यक्तीला ओळखत असावा असा माझा अंदाज होता, तो नंतर खरा ठरला.त्याच्यासाठीच ती ट्रॅव्हल्स तिथे थांबली होती. चढलेल्या व्यक्तीने हळूच विचारणा केली."बशीर पिछे एखाद सीट खाली है क्या रे."
बशीर : नहीं यार भाईजान, लेकीन पुरा केबिन खालीच है क्या हुवा?
भाईजान : कुछ नहीं यार ये लडका बहुत देरसे खडा है यार पुना जानेका है इसको.
बशीर : बस क्या भाईजान लेलो ना यार उसमे पुछनेकीं क्या बात है.
भाईजान : चलो भाई पुना जाना है ना तुमको.
मी हो म्हणालो आणि झटकन बसमध्ये चढलो.मला हायसं वाटलं.मी बसलो आणि मनात सुरू झाले ते विचार चक्र माणसाच्या माणुसकी बद्दल.
     त्या दोघांच्या गप्पा रंगात आल्या होत्या.बशीरचे नुकतेच चार दिवसांपूर्वी लग्न झाले होते. बायकोच्या हाताची आजून मेहंदीही उतरली नव्हती आणि हा बशीर नव्या नवेली दुल्हनला घरी सोडून ड्युटीवर आला होता.व त्याला मालकाने पुण्याची ट्रिप दिली होती.चार रात्रीपासून झोप पुरी झाली नसल्याने आपल्याला आराम करता यावा म्हणून आपल्या ड्रायव्हर मित्राला बोलावले होते.
      गाडी टेम्भुर्णीमध्ये बार्शी चौकात चहा पिण्यासाठी थांबली.चहा पाणी झाल्यावर बशीर मागच्या शीटच्या वर असलेल्या बेडवर झोपण्यासाठी गेला व भाईजान गाडी चालवू लागला.गाडी रेग्युलर स्पीडपेक्षा जरा स्लो चालत होती.पण रात्रीची वेळ असल्याने ते जाणवत नव्हते. भाईजानची ड्रायव्हिंग वर करडी कमान असल्याची जाण त्यावेळी होत होती.कारण आगदी सफाईदार पणे अप्पर डीप्पर देत तो गाडी चालवत होता.
     गाडीने भिगवण चे रेल्वे फाकट पास केले आणि अचानक पुण्याकडुन भरदाव वेगात आलेल्या एका ट्रकने ट्रॅव्हल्सला जोराची डॅश दिली व संपूर्ण ड्रायव्हर साईट घासत कुणाच्याही लक्षात येण्या आधी तो ट्रक ट्रॅव्हल्सचा ड्रायव्हर साईटचा आरसा तोडून भरदाव वेगात आला तसा निघून गेला.ट्रॅव्हल्सला चांगलाच हादरा बसला.गाडीत आरडाओरडा सुरू झाला.
       भाईजानने गाडी रोडच्या खाली घेतली व उभी केली.तसे आतले सारे प्रवासी खाली उतरले व काय झाले हे विचारू लागले.भाईजान व मीही खाली उतरलो.झाला प्रकार सर्वांना सांगितला. एक दोन प्रवासी सोडले तर बाकीचे समजूतदार होते. त्यांनी जे समजायचे ते समजून घेतले व पुन्हा आपापल्या जागेवर जाऊन बसले. भाईजानने गाडीची घासलेली बाजू चेक केली व अचानक त्याला बशीरची आठवण झाली." साला एवढा मोठा झटका बसला गाडीला हा बशीर उठला कसा नाय यार". त्याने माझ्याकडे बघितले... मी नुसतेच ओठ उरफाटे केले.
       भाईजान लगेच केबिनमध्ये चढला.मीही त्याच्या पाठोपाठ चढलो... समोरचे दृश्य पाहून मी तर एकदम शॉक झालो राव.भाईजान तर बेशुद्धच पडला. ज्या बाजूने ट्रक घासून गेला त्या बाजूला बशीरचे डोके होते.तिथून लालभडक रक्ताची धार वाहत होती. केबिन मधल्या मंद प्रकाशातही हे स्पष्ट दिसत होते.मागचे शीट तर रक्ताने पूर्ण भरले होते. मी ताबडतोब पेसेंजरला मदतीसाठी हाक दिली.सर्वजण धावून आले.एकदोघांनी बशीरला चाचपून बघितले पण तो कधीच थंडगार व शांत झाला होता.एकाने भाईजानच्या तोंडावर पाणी मारले तसा तो शुद्धीवर आला.बशीर बशीर म्हणून बशीरला मिठ्या मारू लागला.काय झालं रे देवा माझ्या बशीरला.काय झालं?... बशीर ये बशीर? आरे काय होऊन बसलं रे हे... आता काय सांगू मित्रा तुझ्या बायकोला?... बोलना बशीर?... भाईजान धायमोकलून केविलवाणा आक्रोश करत रडत होता... थोड्याच वेळात पोलीस गाडी आली.पंचनामा झाला... बॉडी पी.एम. साठी ताब्यात घेण्यात आली... माझी तर साली पाचावरच धारण बसली यार.प्रत्येक्षात असा मानवी रक्ताचा तो लोट बघण्याची व माझ्यासमोर माणूस दगावण्याची ही पहिलीच वेळ होती.
      मी विचार करू लागलो कसा मेला असेल बरं हा बशीर... त्या भरदाव वेगात येणाऱ्या ट्रकने ज्यावेळी ट्रॅव्हल्सचा आरसा फोडला त्यावेळी तिचाही आरसा फुटला असणार त्या आरशाचा रॉड बशीरच्या खोपडीत शिरला असावा व ती गाडी इतकी घासून गेली असल्याने त्या रॉडने बशीरची खोपडी फाटली असावी व जागीच त्याचा मृत्यू झाला असावा... असा माझ्या चंचल मनाने अंदाज बांधला.
      पण आजही ती घटना आठवली की माझे मन खिन्न होते. व त्या बशीरच्या निष्प्राण देहाभोवती घिरट्या घालू लागते. कधी हे चंचल मन दूर दूर त्या सोलापूरच्या गल्ली बोळात जाऊन ती हाताची मेहंदी न उतरलेल्या बशीरच्या बायकोचा शोध घेऊ लागते.जो कधीच पूर्णत्वास येऊ शकत नाही.व तिचे पुढे काय झाले असेल याचा वेडा अंदाज बांधू लागते.भाईजान या धक्क्यातून सावरला असेल का?... बशीरचे आई, वडील, बहीण, भाऊ कोणी घटनास्थळी आले असेल का? आले असतील तर त्यांच्या मनातील भावना कशा व्यक्त झाल्या असतील त्यांचा आक्रोश कसा झाला असेल?
     या आशा एक ना अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं मी आजही न कळत शोधत आहे. मनाच्या अंधाऱ्या कोपऱ्यात उगाचच चाचफडत हे सर्व विसरण्याचा निष्फळ प्रयत्न करत आहे. त्या दिवसापासून आज पर्यंत मी एकटा कधीच अंधाऱ्या रात्री गाडीची वाट पहात उभा राहिलो नाही... कारण माझ्या समोर उभा राहतो तो लग्नाच्या हळदीने माखलेला व रक्ताच्या लालीने रंगलेला छिन्न विच्छिन्न खोपडीचा बशीर... बशीर... बशीर.

©शब्दांकन : राम भिमराव पाटोळे(RBP)
मो.नं.7028255007.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा